बदलते जीवन भाग - 1 स्वाध्याय

बदलते जीवन भाग - 1 स्वाध्याय

बदलते जीवन भाग - 1

बदलते जीवन भाग - 1 इयत्ता नववी 

बदलते जीवन भाग - 1 इयत्ता नववी इतिहास


प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ................. या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

अ) चेन्नई

ब) वेल्लूर

क) हैदराबाद

ड) मुंबई

उत्तर :

डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


2) 'जयपूर फूट' चे जनक म्हणून ....................... यांना ओळखले जाते. 

अ) डॉ. एन. गोपीनाथ

ब) डॉ. प्रमोद सेठी

क) डॉ. मोहन राव

ड) यांपैकी नाही

उत्तर :

'जयपूर फूट' चे जनक म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. 


प्रश्न. 2. पुढील चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) डॉ. एन. गोपीनाथ - ओपन हार्ट शस्त्रक्रिया

2) रामचंद्र शर्मा - कुशल कारागीर

3) डॉ. सुभाष मुखोपाध्याय - टेस्ट ट्यूब बेबी

4) डॉ. मोहन राव - पोलिओ 

उत्तर :

चुकीची जोडी : 

डॉ. मोहन राव - पोलिओ


प्रश्न. 3. टिपा लिहा. 

1) कुटुंबसंस्था

उत्तर :

i) स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय समाजाची कुटुंबसंस्था ही एक प्रमुख ओळख होती. 

ii) भारत हा 'एकत्र कुटुंब पद्धतीचा देश' म्हणून जगभर ओळखला जायचा. 

iii) जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंबपद्धतीला चालना मिळाली आहे. 

iv) चार्लस् कुले यांनी कुटुंबसंस्थेस 'प्राथमिक समूह' म्हटले आहे. कारण कुटुंब हा व्यक्ती व समाज यांना साधणारा दुवा आहे. 

v) मानव समाजाचा इतिहास हा कुटुंबाचा इतिहास आहे. कुटुंबसंस्थेतूनच मनुष्याचा जन्म, विकास व संस्कृतिकरणास प्रारंभ होतो. त्याचा विस्तार म्हणजे संपूर्ण राष्ट्र होय. कुटुंबाचे विकसित स्वरूप संपूर्ण मानवजात होय.


2) जयपूर फूट तंत्रज्ञान 

उत्तर :

i) 'जयपूर फूट' तंत्रज्ञानाच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. 

ii) १९६८ पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. 

iii) जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रूग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात. 

iv) या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. पाण्यात वा ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोईचे आहेत.


3) शहरीकरण

उत्तर :

i) शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रीत होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. 

ii) नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. नागरीकरणावर हवा, पाणी, समूहजीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक परिणाम घडवून आणतात. 

iii) स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात नागरी लोकसंख्या वाढीची काही प्रमुख कारणे म्हणजे मृत्युदरातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार, स्थलांतर ही होत. 

iv) शहरीकरणात शहरांवर येणारा हा ताण थांबवायचा असल्यास छोट्या-छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महानगरांची वाढ नियंत्रित करणे ग्रामीण व नागरी भागांत आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे हे उपाय आहेत.


4) बदलते आर्थिक जीवन

उत्तर :

i) आर्थिकदृष्ट्या पूर्वी गावांचे जीवन स्वयंपूर्ण होते. 

ii) ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेतीतील उत्पादन तेथील कारागीरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे. 

iii) आता ही परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भाग शेती व शेतीनिगडित जोडधंद्याशी जोडला गेला आहे, तर नागरी समाज बिगरशेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे. 


4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली

उत्तर :

कारण - i) भारतात १९७८ पूर्वी दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती. 

ii) पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला यांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. 

iii) देशातील पोलिओचे निर्मूलन होऊन पोलिओ आटोक्यात आला पाहिजे. म्हणून पोलियो लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.


2) ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली

उत्तर :

कारण -  i) ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेती व शेतीवर आधारित उद्योगधंदे तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. 

ii) शेतीसाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी पाऊस पडल्यावर मिळते. पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असतो. त्यामुळे शेतीतील पिकासाठी पाणी अपुरे पडते.

iii) शासनाद्वारे विहिरी खणणे व नळांवाटे पाणीपुरवठा करणे यांसारख्या योजनांद्वारे पाणीपुरवठ्याची सोय केली जावी. म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.


5. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे ?

उत्तर :

i) आपल्या संविधानाप्रमाणे कायदयापुढे सगळे समान आहेत. 

ii) कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे.


2) समाजकल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे ?

उत्तर :

i) कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानात नमूद करण्यात आलेले आहे. त्यासाठी समाजकल्याण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 

ii) या समाजकल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आयोग्यसुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे.


३) ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत ?

उत्तर : 

आर्थिक व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे, सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही तीन महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहेत.


प्रश्न. 6. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या

उत्तर :

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.

i) भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे सुपोषण साधावे व सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले आहे. 

ii) सहाव्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्यसेवा तसेच वैदयकीय सेवा ग्रामीण भागातील लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. 

iii) भारतात आरोग्याच्या संदर्भात अँलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. 

iv) आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. 

v) १९६२ मध्ये तमिळनाडुमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉ.एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात 'ओपन हार्ट शस्त्रक्रिया' यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. 

vi) 'जयपूर फूट' च्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. १९६८ पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात त्याचा पाय जायबंदी झाला. तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.

Previous Post Next Post